गेल्या वर्षी जुहू येथे झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणातील चार आरोपींना विशेष न्यायालयाने खटल्याच्या कारवाईपासून दिलासा दिला आहे. त्यानुसार या आरोपींवर आता खटला चालविण्यात येणार नाही. असा दिलासा मिळालेले या प्रकरणातील हे पहिलेच आरोपी आहेत.
युवराज भाटिया, करण चावला, स्नेहा तलरेजा आणि मोहम्मद हुसैन अशी या चौघा आरोपींची नावे आहेत. शासकीय रुग्णालयातून व्यसनमुक्तीचे उपचार घेण्याची तयारी अशा प्रकरणांतील आरोपींनी दाखवली अथवा कमी प्रमाणात अंमलीपदार्थ बाळगले असल्याचे सिद्ध झाले, तर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार या आरोपींना खटल्याच्या कारवाईपासून न्यायालय दिलासा देऊ शकते. या चौघा आरोपींनी याच कलमानुसार न्यायालयाकडे कारवाईपासून दिलासा देण्याची विनंती केली होती.
अतुल अग्निहोत्रीचा अर्ज
या रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी असलेल्या अतुल आणि शिल्पा अग्निहोत्री   या दाम्पत्यानेही खटल्यापासून दिलासा देण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे.