मुंबई : राज्यात सध्या ४० हजार स्कूल बस नोंदणीकृत असून ५० ते ६० हजार वाहने स्कूल बस म्हणून अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करीत आहेत. त्यामुळे अनधिकृत वाहनचालक व मालकांनी दंड भरून तीन महिन्यांमध्ये स्कूल बसच्या २०११ च्या नियमावलीनुसार नोंदणी करण्यात यावी. परिवहन विभागाने अनधिकृत स्कूल बस आणि वाहनांवर कारवाई करावी. अशी वाहने आढळल्यास संबंधित परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी येथे दिले.

सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात ५०-६० हजार वाहने स्कूल बस म्हणून चालविली जात असल्याची तक्रार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी केली. नोंदणीकृत स्कूल बसचालकांकडून नियमावलीचे पालन केले जाते. मात्र अनधिकृत वाहनांमधून मुलांना धोकादायक पद्धतीने नेण्यात येते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अनधिकृत स्कूलबस चालक-मालकांनी परिवहन खात्याकडे दंड भरून नोंदणी करून घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असून, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील. त्यावेळी वाहनचालक आणि पालक संघटनांच्या अडचणींचाही विचार केला जाईल. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सरनाईक यांनी नमूद केले.