देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन मुंबई : मेट्रो प्रकल्पावरून अपश्रेय तुमच्या वाटय़ाला येऊ नये, यासाठी कांजूरमार्ग येथे कारशेडचा हट्ट सोडून ती आरेला करावी. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नये, अशी हात जोडून विनंती आहे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनसंवादात मेट्रो कारशेड वादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना ही दिशाभूल का करण्यात येत आहे. आपण अजूनही महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णत: वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल, हे समितीनेच सांगितले असून शिवाय प्रकल्पास चार वर्षांंचा विलंबही लागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. चर्चेला आमची तयारी लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो. मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय घेतल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ.