मुंबई : करोनाकाळात टॅक्सीचालकांचे बिघडलेले आर्थिक गणित हळूहळू जुळू लागले आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी टॅक्सीमध्ये 'पॅनिक बटण' बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी टॅक्सीचालकांना पदरमोड करावी लागणार आहे. परिणामी, टॅक्सीचालकांनी टॅक्सीमध्ये पॅनिक बटण बसविण्यास विरोध केला आहे. हेही वाचा >>> म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची सोडत, बुधवारपासून अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात करोनामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि त्यानंतरच्या कडक निर्बंधांमुळे टॅक्सीचालकांचे आर्थिक गणित कोलमडले होते. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू कारभार पूर्वपदावर आला. त्यानंतर टॅक्सीचालकांची विस्कटलेली आर्थिक घडीही सुरळीत होऊ लागली. राज्य सरकारने महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन टॅक्सीमध्ये पॅनिक बटण बसविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी टॅक्सीचालकांना १० ते १२ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, टॅक्सीमधून महिला सुरक्षित प्रवास करीत आहेत. त्यामुळे टॅक्सीमध्ये पॅनिक बटण बसविण्याची गरज नाही, अशी भूमिका मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने घेतली आहे. मुंबईत दिवसा आणि रात्री मोठ्या संख्येने महिला टॅक्सीतून प्रवास करतात. हेही वाचा >>> मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन चार तास पावसाचे गेल्या ६० वर्षांमध्ये टॅक्सीचालकांकडून विनयभंगाची किंवा कोणत्याही प्रकारची छळवणूक झाल्याची तक्रार नाही. त्यामुळे महिलांनी टॅक्सीने प्रवास करणे सुरक्षित आहे, असा दावा युनियनकडून करण्यात आला आहे. टॅक्सीचालकांना पॅनिक बटण बसवण्यासाठी १० ते १२ हजार रुपये खर्च करावे लागतील. टॅक्सीचालकांवर हा आर्थिक बोजा टाकण्याऐवजी राज्य सरकारने निर्भया निधीतून हा खर्च भागवावा. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आधीच टॅक्सी व्यवसाय आर्थिक संकटात आला असून अनेक टॅक्सीचालकांनी हा व्यवसाय सोडला आहे. सध्या मुंबईत ४८ हजार टॅक्सीचालक कसेबसे टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी टॅक्सीमध्ये पॅनिक बटण बसवण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वॉड्रोस यांनी केली आहे.