मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणात (जेएनपीए) ८०० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक आणि इतर आरोपींनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारातून कमवलेल्या रकमेचा माग काढण्याच्या दृष्टीने ईडीने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार मदभावी, टीसीईचे प्रकल्प संचालक देवदत्त बोस, मे. टाटा कन्सल्टींग इंजिनीअर्स (मुंबई), मे. बोस्कालीसस्मीत इंडिया (मुंबई) व मे. जान दे नूल ड्रेगिंग(चेन्नई) व इतर आरोपी गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडीने तपासाला सुरुवात केली आहे. ईडीतील वरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
प्राथमिक तपासानुसार, जेएनपीएच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि दोन खासगी कंपन्यांनी संगनमत करून गुन्हेगारी कट रचला. या कथित गैरव्यवहारात इतर दोन कंपन्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार न्हावा शेवामधील जेएनपीटी येथील जहाजांना येण्या-जाण्याच्या मार्गाची खोली वाढवण्याचे कंत्राट आरोपी कंपन्यांना देण्यात आले होते. या प्रकल्पासाठी एका खासगी सल्लागार कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात आले होते.
तपासानुसार प्रकल्पाच्या टप्पा-१ मध्ये मार्गांची खोली वाढवण्यात व गाळ काढण्यात आला. यावेळी खोट्या दाव्यांच्या आधारावर ३६५ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम देण्यात आली.