मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अवघ्या ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीत १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली होती. प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत फक्त २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत ६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

सीईटी कक्षामार्फत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी ३१ जुलै रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीसाठी २ लाख १७ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविला होता. त्यातील १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये १५ हजार ८५२ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. या विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा होता.

मात्र ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत फक्त २५ हजार ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे सीईटी कक्षाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिली होती. या एक दिवसांमध्ये ६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, त्यामुळे अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार ६३५ इतकी झाली. निवड यादीमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार ८५२ इतकी आहे. त्यामुळे अन्य पसंतीक्रम मिळालेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.

अभियांत्रिकी प्रवेशाची दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ६ ते ८ ऑगस्टदरम्यान दुसऱ्या फेरीसाठी अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरता येणार आहे. तसेच ११ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.