भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारपरिषदेत सचिन वाझे प्रकरणावरून केलेल्या आरोपांना आज(सोमवार) युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब यांची देखील उपस्थिती होती. ''भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले, हे सगळे आरोप हे तथ्यहीन असून आज त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. त्यांनी जे काही आरोप केले, हे त्यांनी सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी सामोरं जावं.'' असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते?” वरूण सरदेसाई म्हणाले, ''मी एका अतिशय सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबातून येतो, मला कुठंतरी राजकारणाची आवड आहे. म्हणून मी युवासेनेचं शिवसेनेचं काम करतो. आज जे काही घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही व माझ्या हातून तसं घडणार देखील नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटंबाची पार्श्वभूमी मला वाटतं सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो व नंतर त्यांच्यावर असंख्य अगदी गंभीर गुन्हे खून, अपहरण, खंडणी असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्या कुटुंबावर दाखल आहेत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर देखील आहे.'' Nitesh Rane has made baseless allegations against me. People know the history of Rane family so I don't need to say much on that. I will file a criminal defamation against him if he fails to apologize: Yuva Sena Secretary Varun Sardesai pic.twitter.com/iDvdDHLlLi — ANI (@ANI) March 15, 2021 “वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा” तसेच, ''माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी मी सांगितली आहे, त्यांच्या कुटुंबाची माहिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणी कोणावर कसले आरोप करावे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तसं तर संपूर्ण राणे कुटुंबीयांना बेछुट आरोप करायची सवयच लागली आहे. ज्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा असेच आरोप त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर केले. आज जेव्हा ते भाजपात गेले तेव्हा, महाविकासआघाडीमधील विविध नेत्यांवर करत आहेत व गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत. खरंतर या संपूर्ण राणे कुटुंबीयांना महाराष्ट्रातील जनता आता, अजिबात गांभीर्याने घेत नाही, त्यांना भीक घालत नाही. त्यांची जेव्हा कधी पत्रकारपरिषद होते, त्यांचं जेव्हा कधी एखादं विधान समोर येतं व जेव्हा ते टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर दाखवलं जातं. त्याच्या खालच्या जर तुम्ही कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जनता त्यांना किती गांभीर्याने घेते.'' असं देखील वरूण सरदेसाई यांनी यावेळी बोलून दाखवलं.