सौरभ कुलश्रेष्ठ, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प माहिती तंत्रज्ञानावर आधारित असल्याने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक या केवळ तीन राज्यांतच स्पर्धा होती. आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्राकडे खेचण्यासाठी स्पर्धा करत असताना चौथ्या कोणत्याही राज्याचे नावच नव्हते. महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा निर्णय जवळपास झाला असून केवळ केंद्र सरकारचा होकार घ्यावा लागेल, असे वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट करत मग आता अचानक गुजरात आले कुठून, असा सवाल माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

वेदांत-फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई हे त्याबाबतच्या चर्चेत सहभागी होते. आता ही गुंतवणूक गुजरातकडे गेल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करत या प्रकल्पासाठी झालेल्या चर्चेची सारी कहाणी लोकसत्ताला सांगितली. आपल्याविरोधात ब्र उच्चारण्याची धमक नसलेले सरकार महाराष्ट्रात असल्याची केंद्रातील भाजप सरकारची खात्री पटल्यानेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आल्याची टीकाही सुभाष देसाई यांनी केली.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा माहिती तंत्रज्ञान उद्योगाशी निगडित आहे. देशात माहिती तंत्रज्ञान उद्योगात महाराष्ट्रातील पुणे, तेलंगणमधील हैदराबाद व कर्नाटकातील बेंगळूरु ही तीन ठिकाणे अग्रेसर आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात हा प्रकल्प यावा यासाठी चर्चा सुरू केली त्यावेळी वेदांत-फॉक्सकॉनची मंडळीही महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक या तीन राज्यांचाच विचार करत होती. या तीन राज्यांशिवाय कोणतेही चौथे राज्य स्पर्धेत नव्हते. महाराष्ट्राने स्पर्धा करून हा प्रकल्प आपल्याकडे जवळपास खेचला होता. आमचा करार होणार होता. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, असे सांगत आता अचानक गुजरातमध्ये प्रकल्प होणार असल्याची घोषणा झाली. अचानक गुजरात आले कुठून, असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेला आम्ही मे २०२२ मध्ये गेलो होतो. त्यावेळी वेदांत समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी आमची चर्चा झाली. चर्चेअंती आता आमचे समाधान झाले आहे. आम्ही महाराष्ट्रातच हा प्रकल्प उभारू असे त्यांनी आम्हाला सांगितले. मात्र उठता उठता फक्त भारत सरकारचा होकार घ्यावा लागेल असे ते हसत हसत म्हणाल्याने आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आता प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची घोषणा पाहता आमची भीती दुर्दैवाने खरी ठरली, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले. दिल्लीत आम्ही जूनमध्ये फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. जमीन, पाण्याची उपलब्धता, सवलती यावर चर्चा झाली. त्यानंतर आम्हाला आता कोणतीही अडचण नाही. लवकरच करार करू, असे त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का? जयंत पाटलांचा सवाल

मात्र, आता महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. आपल्याविरोधात ब्र उच्चारायची ताकद नाही, केवळ मूकसंमती देणारे सरकार महाराष्ट्रात आहे याची खात्री केंद्रातील भाजप सरकारला असल्यानेच हे सर्व सुरू आहे, अशी टीकाही सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर केली. शिंदे-फडणवीस दिल्लीला वारंवार जात होते. तेव्हा बरीच टीका झाली. महाराष्ट्राला सर्व सहकार्य देऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवला हेच का ते आश्वासन, असा खोचक सवालही देसाई यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former industries minister subhash desai reaction on vedanta foxconn semiconductor zws
First published on: 14-09-2022 at 05:32 IST