हार्बर मार्गावर ९ ऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी या प्रस्तावास अनुकूल प्रतिसाद दिला असून १२ डब्यांची गाडी या मार्गावरून लवकरच सुरू करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू होईल. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान १२ डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत मुंबई रेल विकास मंडळाने ७१४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून राज्य सरकारकडे परवानगीसाठी तो सात महिन्यांपूर्वी सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकल्प तीन ते चार महिने रेंगाळला असल्याचेही महामंडळाचे मत होते. या मार्गावरील १९ स्थानकांच्या फलाटांचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मंजुरी मिळण्याची आवश्यकता होती. गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच फलाटांची लांबी वाढविण्याच्या कामास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय शनिवापर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी १ डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची वेळ अद्याप निश्चित झाली नसली तरी हा कार्यक्रम होणारच याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री हार्बरवरील १२ डब्यांची गाडी सुरू करण्याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.    

मुख्यमंत्री उपनगरी गाडीने चेंबूरला येणार?
लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या वास्तूच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपनगरी गाडीने प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते टिळकनगर असा प्रवास ते करणार आहेत. यास रेल्वेच्या सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे.