डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळणारा जनसागर आणि शीवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा या पाश्र्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत सर्व पोलीस ठाण्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, चैत्यभूमीकडे होणारी गर्दी लक्षात घेऊन वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी या प्रकरणी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या चौथऱ्याभोवती सुरक्षा कडे उभारण्यात आले आहे. याशिवाय चैत्यभूमीच्या मार्गावर बंदोबस्ताची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. सर्व पोलिसांना मध्यरात्रीपासूनच सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.