मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची दोनवेळा हमी देऊनही त्याचे वारंवार उल्लंघन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. मलिक यांच्या कृतीतून त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करायची असल्याचेच दिसून येते, असे नमूद करत त्यांचा यामागे हेतू काय, असा प्रश्न न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने केला. तसेच मलिक हे जर आधीच्या आदेशात त्यांना दिलेल्या सवलीचा अशाप्रकारे गैरफायदा घेत असतील, तर त्यांच्या त्या सवलती रद्द केल्या जातील, असेही न्यायालयाने मलिक यांना सुनावले. जात पडताळणी समितीसमोर तक्रार करतानाही मलिक यांनी बनावट जात प्रमाणपत्राऐवजी केवळ जात प्रमाणपत्र असा उल्लेख केल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. या प्रकरणी आम्ही मलिक यांना उत्तर दाखल करण्याची संधी देत असलो तरी त्यांनी न्यायालयाने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेऊन नये, असा इशारा न्यायालयाने दिला. वानखेडे कुटुंबीयांबाबतची विधाने आपण न्यायालयाचा अवमान न करता केल्याचे दाखवणारे प्रतिज्ञापत्र आपल्याला दाखल करायचे असल्याचे मलिक यांच्या वतीने करण्यात आल्यावर न्यायालयाने मलिक यांच्या कृतीबाबत संताप व्यक्त केला. समीर यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका केली असून त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी मलिक यांनी जानेवारीच्या सुरुवातीला केलेल्या विधानाबाबत ज्ञानदेव यांच्यातर्फे सांगण्यात आले.