मुंबई : आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही आरोपीने त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले. दर्शन याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी अरमान खत्री (१९) याला जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. गेल्याच आठवड्यात विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. विशेष न्यायालयाच्या तपशीलवार आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. हेही वाचा >>> मुंबई : पाणीविषयक प्रकल्पांसाठी सल्लागारांचे पथक; पाच सल्लागारांबरोबर पाच वर्षांसाठी करार करणार अरमान १९ वर्षांचा आहे आणि तो आयआयटीमध्ये शिकत आहे. शिवाय त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो मुंबईचा रहिवासी आहे. तसेच त्याला आणखी काही काळ कोठडीत ठेवण्याचे कोणतेही न्याय्य कारण दिसून येत नाही, असेही न्यायालयाने अरमान याला जामीन मंजूर करताना नमूद केले. दर्शन याचा जातीवरून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. परंतु. अरमान याने त्याला पेपर कटरने धमकावल्याची घटना वगळता, जातीच्या कारणास्तव अरमान याने दर्शन याचा छळ केल्याचा तसेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. हेही वाचा >>> Google I/O 2023 Live: थोड्याच वेळात सुरू होणार Google I/O इव्हेंट, महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर त्याचप्रमाणे आत्महत्येपूर्वी दर्शन याने लिहिलेल्या चिठ्ठीत अरमान याच्या नावाचा उल्लेख वगळता कोणतेही कृत्य किंवा घटनेबाबत कहीच नमूद केलेले नाही, असेही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आनंद कानडे यांनी आदेशात म्हटले. दरम्यान, मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या आणि अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या दर्शनने १२ फेब्रुवारी रोजी आयआयटी, मुंबईच्या पवई येथील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तीन आठवड्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सोळंकी याच्या खोलीतून “अरमानने मला मारले आहे” असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यानंतर पोलिसांनी अरमानला ताब्यात घेतले आणि नंतर त्याला सोळंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केली.