मुंबई- रेल्वे परिसरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तब्बल ४६ मोबाईल फोन चोरांनी लंपास केले आहेत. गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये चढताना सर्वाधिक मोबाईलची चोरी होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

रेल्वे पोलिसांचे पश्चिम आणि मध्ये असे दोन विभाग आहेत. मध्य परिमंडळात १५ तर पश्चिम परिमंडळात २३ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू असते. त्यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. दिवसेंदिवस गर्दी वाढत असून गुन्हेगारीही वाढते आहे. रेल्वेत दररोज विविध प्रकारचे गुन्हे होत असले तरी सर्वाधिक गुन्हे हे मोबाईल चोरीचे होते आहे. शनिवार ७ आणि रविवार ८ जून या दोन दिवसात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीच्या ४६ घटनांची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासी ट्रेन मध्ये चढत असताना मोबाईल चोरण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी प्रवासी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असतात. तसेच अनेक जण बोलत असताना गाफिल असतात. त्यामुळे खिशातून मोबाईल काढला जातो. ट्रेनमध्ये दाराजवळ बोलत उभे असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन देखील काढून घेण्याचे प्रकार वाढले असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. मोबाईल फोन ट्रॅक केले जाण्याची शक्यता असल्याने भुरटे चोर मोबाईल फोनचे सुटे भाग वेगळे करून ते विकत असतात, असेही पोलिसांनी सांगितले.