मुंबई: आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. या ऐतिहासिक घटनेला १६ एप्रिल २०२२ रोजी १६९ वर्षे पूर्ण होत असून रेल्वे आता १७०व्या वर्षांत पदार्पण करत आहे. भारतातील रेल्वेच्या पहिल्या प्रवासानिमित्त, आझादी का अमृत महोत्सव, रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिनानिमित्ताने मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) ऐतिहासिक वारसा इमारतीवर येत्या रविवारी एक वेगळा ध्वनी प्रकाश कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या नावाने प्रसिद्ध असलेली मध्य रेल्वेची सध्याची मुख्यालय इमारत एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. ही भव्य वास्तू मूलत: जीआयपी रेल्वेचे कार्यालय म्हणून नियोजित होती. वास्तू विशारद फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या वास्तूचे आरेखन केले होते. १८७८ मध्ये तिचे बांधकाम सुरू झाले आणि १८८७ मध्ये ब्रिटनच्या सम्राज्ञी व्हिक्टोरिया यांचे नाव या स्थानकाला देण्यात आले. हे स्थानक बांधण्यासाठी बांधण्यासाठी जवळपास एक दशकाचा कालावधी लागला आणि त्यासाठी १६ लाख १३ हजार ८६३ रुपये खर्चून स्टीव्हन्सने तेव्हाच्या आशियातील सर्वात मोठय़ा इमारत वास्तूची रचना केली. व्हिक्टोरिया टर्मिनसची रचना गॉथिक शैलीत भारतीय संदर्भाला अनुरूप बनवण्यात आली. गॉथिक शैली, मुघल आणि हिंदू स्थापत्यकलेचा रंग आणि जटिलता प्रदान करते. या वास्तूमध्ये पहिला महत्त्वाचा बदल १९२९ मध्ये करण्यात आला. स्थानकाला लागून असलेले पूर्वीचे स्टेशन उपनगरीय वाहतुकीसाठी राखीव होते आणि त्यात सहा फलाट होते. हळूहळू वाढत जाणारी प्रवासी संख्या पाहता सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वे आणि मेल, एक्स्प्रेसचे फलाट आणि गाडय़ांची संख्याही वाढवण्यात आली. मार्च १९९६ मध्ये या स्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जुलै २००४ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्मारक म्हणून या इमारतीची नोंद केली. जुलै २०१७ पासून त्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करण्यात आले. ध्वनी प्रकाशाचा खेळ भारतीय रेल्वे १७० व्या वर्षांत पदार्पण करत असल्याचे निमित्त साधून येत्या रविवारी आगळावेगळा ध्वनी प्रकाश कार्यक्रम सादर करणार आहे. या कार्यक्रमात रेल्वे कर्मचारी असलेले ७० कलाकार भारतीय सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करतील. यावेळी नऊ नाटय़रसांच्या विविध भावभावनांमधून रेल्वेचे कलावंत इतिहास जिवंत करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.