गेल्या दहा वर्षांमध्ये सुमारे ७० हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षमता वाढली नाही म्हणून श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा झाली. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. पण ८०० पानांच्या श्वेतपत्रिकेत प्रकल्प रखडण्याची फक्त कारणमिमांसा करण्यात आली. आरोप किंवा प्रकल्पांना घाईगडबडीत मंजूरी का देण्यात आली याचा काहीच उल्लेख नाही. एकूणच डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखी ही श्वेतपत्रिका असल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांनीच व्यक्त केली.
सिंचनाच्या घोटाळ्यावरून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर बरेच आरोप झाले. प्रकल्पांचे आकडे फुगविण्यात आले येथपासून ठराविक ठेकेदारांचे हित जपण्यात आल्याची चर्चा झाली. दोन खंडातील सुमारे ८०० पानांच्या श्वेतपत्रिकेत त्याचा कसलाही उल्लेख सापडत नाही. नक्की किती सिंचन वाढले हा वादाचा मुद्दा होता. राष्ट्रवादीने आपलेच घोडे पुढे दामटले. यावर मुख्यमंत्री चव्हाण यांना विचारण्यात आले असता त्यांनी, अद्याप आपण श्वेतपत्रिका संपूर्ण वाचलेली नाही, असे उत्तर देत अधिक वाद टाळला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादंग होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण बैठकीपूर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील अशा काही ठराविक मंत्र्यांची बैठक झाली. त्यात चर्चा न करता नुसतीच श्वेतपत्रिका मांडण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशीची तयारी दर्शविण्यात आली. पण काँग्रेसच्या वतीने ती नाकारण्यात आली. श्वेतपत्रिकेत प्रत्येक प्रकल्प रखडण्याची कारणे देण्यात आली आहेत. तसेच कोणत्या खासदार-आमदाराने कोणती सूचना केली होती त्यांची नावेही देण्यात आली आहेत. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात पाच जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. चौकशी नेमून वेळकाढूपणा करण्यास काँग्रेसचा विरोध होता. श्वेतपत्रिकेत अजितदादांना क्लिनचिट देण्यात आली असली तरी न्यायालय काय निर्णय देते यावरही सारे अवलंबून आहे. यामुळेच राष्ट्रवादी किंवा अजितदादांवर टांगती तलवार कायम आहे. न्यायालय विशेष चौकशी पथकाच्या (एस.आय.टी.) माध्यमातून चौकशी करण्याचा आदेश देऊ शकते, असाही एक मतप्रवाह राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे.
काँग्रेसने सध्या तरी ‘वेट अँण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. श्वेतपत्रिकेवर आता चर्चा होईल. त्यातून राष्ट्रवादीलाच फटका बसेल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
अजितदादांचा प्रवेश कधी ?
श्वेतपत्रिका सादर झाल्याने अजित पवार यांचा मंत्रिमंडळ फेरप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. साऱ्या आरोपांमधून मुक्त झाल्यावरच अजितदादांचा मंत्रिमंडळात प्रवेश होईल, असे शरद पवार यांनी जाहीर केले होते. श्वेतपत्रिकेत अजितदादांवरील आरोप किंवा त्यावर काहीच मतप्रदर्शन करण्यात आलेले नाही. श्वेतपत्रिका सादर झाल्याने १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अजितदादांचे पुनर्वसन होईल, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. त्यातच पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजितदादांचा लवकर प्रवेश करावा, अशी मागणी केली. मात्र अधिवेशनात गोंधळ नको म्हणून अधिवेशनानंतरच त्यांचा प्रवेश होईल, असा अंदाज आहे.