मुंबई : मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थींच्या घरातील पुरुषांच्याही ‘केवायसी’ कागदपत्रांचा सायबर व हवाला गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचे जुहू पोलिसांनी पितळ उघडे केले. यानंतर राज्याचा महिला विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. दीड कोटी केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोडून एक कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा हवेत विरून गेली, मात्र आता ही पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारमधील नेते लाडक्या बहिणींना नाराज करण्याच्या मनस्थित नाहीत. त्यामुळे या योजनेची पडताळणी युद्धपातळीवर होत नाही. योजनेसाठी गेल्या वर्षी २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यातील काही लाभार्थींच्या बँक खात्याची आधार कार्डशी जुळणी झालेली नव्हती. अशा बहिणी नंतरच्या काळात पात्र ठरत असल्याने लाभार्थींची संख्या वाढत आहे, असे महिला विकास विभागाकडून सांगितले जाते.
मार्च महिन्यातील लाभार्थींची संख्या कायम ठेवताना त्या महिन्याचाही लाभ दोन कोटी ४७ लाख बहिणींना देण्यात आला आहे. यात निकषात न बसणाऱ्या लाखो बहिणींची संख्या आहे. महिला विकास विभागाच्या पातळीवर आतापर्यंत कोटेकोर पडताळणी होत नसल्याने सरकारच्या पर्यायी जनतेचे लाखो रुपये अपात्र बहिणींच्या बँक खात्यावर जमा होत आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांची ‘केवायसी’ कागदपत्र घेऊन त्यांच्या बँक खात्यात कोट्यवधींचा व्यवहार केला जातो. त्याचवेळी स्त्री व पुरुषांचे नामसाधर्म्य (शीतल नाव महिलेचे आणि पुरुषांचेही आहे) असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे योजनेची संपूर्ण काटेकार पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
…तरीही लाभार्थींच्या संख्येत वाढ
- पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी कुटुंबीयांतील बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना महिला विकास विभागाने फेब्रुवारीत दिलेल्या आहेत.
- त्यानंतर काही बहिणींनी स्वत:हून योजनेचा लाभ नाकारला. चारचाकी वाहन असलेल्या बहिणी अपात्र ठरल्या. शासकीय लाभ घेणाऱ्यांचा लाभ कपात करण्यात आला. ६५ पेक्षा जास्त वयोमान झालेल्या बहिणी बाद झाल्या.
- अशा प्रकारे पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात आले. मात्र ही संख्या कमी होण्याऐवजी दर महिन्याला वाढत असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.