अरुण दाते हे इंदूरमध्ये वाढले असल्यामुळे गझल, हिंदी/उर्दू गाण्यात रमणारे होते. श्रीनिवास खळे यांनी त्यांना मराठी गाण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी माझे इंदुरी मराठी उच्चार लोकांना आवडणार नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातील गायक बघा, असे खळे यांना सांगितले होते. मग खळे यांनी अरुण दाते यांचे वडील रामूभय्या दाते यांना गळ घातली. रामूभय्यांनी खळ्यांना सांगितले, काळजी करू नका. माझा मुलगा तुमच्यासाठी नक्की गाईल. मग त्यांनी मुलाला फैलावर घेतले. इतके मोठे संगीतकार तुला बोलवतायत आणि तू नाही म्हणतोस? अरुण दाते यांनी अखेर खळे यांना होकार दिला.

आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमासाठी ‘शुक्रतारा’ गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले. कार्यक्रम प्रसारित केला जाई तेव्हा गाण्याचे गायक कोण, त्यांची नावे सांगण्याची पद्धत होती. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचे नाव विचारून घ्यायचे राहिले. अरुण दाते यांचे खरे नाव अरविंद. घरी त्यांना ‘अरु’ म्हणत असल्यामुळे खळे यांचा त्यांचे नाव अरुण असेल असा समज झाला. त्यांनी गाण्याच्या गायकाचे नाव अरुण असे सांगितले. ‘भावसरगम’ कार्यक्रमात त्या गाण्याचे गायक म्हणून अरुण दाते हेच नाव सांगितले गेले आणि पुढे तेच रूढ झाले. अरुण दाते यांचे वडील रामूभय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार दाते यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केले. इंदूरजवळील धार येथे पं. कुमार गंधर्व यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे गिरविले. १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली.

मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या मराठी भावगीत/संगीत कार्यक्रमाचे सुमारे अडीच हजारांहून अधिक प्रयोग केले. मराठीतच नव्हे तर उर्दूतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटविला.  मराठी, उर्दू गाण्यांचे त्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. २८ वर्षे टेक्स्टाइल इंजिनीअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वत:ला संगीत क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिले.

आजवरच्या प्रवासात खूप कलाकार पाहिले, पण इतकी लोकप्रियता लाभलेला, इतका सरळसाधा आणि जमिनीवर असलेला कलाकार अजून तरी पाहिला नाही. ‘शुक्रतारा’ या गाण्याने बाबांचे आणि गाण्याशी संबंधित सगळ्याच कलाकारांचे आयुष्य समृद्ध केले आहे. बाबांकडून नेहमी हीच शिकवण मिळाली की, स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणे गरजेचे आहे. ९० वर्षांच्या मराठी भावसंगीताच्या काळामध्ये (१९२६-२०१६) बाबांचा ‘शुक्रतारा’ ५५ वर्षे टिकून आहे आणि आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.       – अतुल अरुण दाते

(मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ या पुस्तकातील अतुल दाते यांचे मनोगत)