मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिल्याने काँग्रस आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेते बाळासाहेब थोराते हे महात्मा गांधी यांच्या तत्त्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेंच्या औलादीत नाही, असे म्हणत संग्राम भंडारे व भाजपवर टीका केली.
‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपची खेळी आहे. महात्मा गांधी यांचा खून करण्याआधी नथुराम गोडसेसुद्धा गांधीजींच्या पाया पडला व नंतर तीन गोळ्या झाडल्या हा इतिहास आहे. आजही त्या गोडसेचे गुणगान गाणाऱ्या औलादींना भाजप पोसत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा म्हणतो ‘आम्ही नथुराम गोडसे होऊ’ ते तर नथुराम गोडसे आहेतच, पण तुमचा पक्षही नथुराम गोडसेंच्या विचाराने चालला आहे. बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील वातावरण खराब करावे म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अशी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का पाळतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, अशी टीका सपकाळ यांनी केली. भाजपने असे राजकारण करू नये आणि आज भाजप विरोधकांवर ज्यांना सोडतो तेच उद्या भाजपच्या अंगावर येतील, असा इशारा देत अशा धमक्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन आहे. त्यामुळे कारवाई होणारच नाही, असेही सपकाळ म्हणाले.