मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पोलिसांना कठोर कारवाईसह आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. राणे यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात रायगड येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे यांच्याविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे पोलिसांनीही २४ ऑगस्टला राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. धुळे पोलिसांनी नुकतीच राणे यांना नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे कळवले होते.  अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. आपल्याविरोधातील आरोप हे राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावाही राणे यांनी याचिकेत केला आहे. त्याचवेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या किंवा गटाच्या विरोधात द्वेषपूर्ण हिंसाचार किंवा संताप वाढवण्याचा कोणताही हेतू नव्हता. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचाही आपला हेतू नव्हता, असा दावाही राणे यांनी केला आहे.