मराठी रंगभूमीवर बराच काळ कोर्टरूम ड्रामा आलेला नाही. फार वर्षांपूर्वीचा आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच हा नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी गाजवलेला कोर्टरूम ड्रामा आजही रसिकांच्या स्मरणात ताजा आहे. पण त्यानंतर असा प्रभावी कोर्टरूम ड्रामा अद्यापि मंचित झालेला नाही. आता पुनश्च सबकुछ पुरुषोत्तम बेर्डे संकल्पित, दिग्दर्शित, नेपथ्यित, संगीत, वेशभूषेसह अनेक जबाबदाऱ्या पेललेलं गंगा यमुना सरस्वती हा राजन मोहाडीकर लिखित कोर्टरूम ड्रामा रंगमंचावर आलेला आहे. अर्थात त्याची मांडणी तशी जुनीच आहे. तो मी नव्हेचला समांतर जाणारं कथानकच यात आहे.
पडदा उघडतो तेव्हा कोर्टरूम दिसतं. तिथं तीन ठिकाणची तीन कुटुंबं आपण फसवले, लुबाडले गेलो आहोत आणि ती व्यक्ती एकच स्त्री असल्याचं सांगत एकच कल्लोळ करताहेत. त्यांचे वकील अॅड. एरंडे त्यांना न्याय मिळेल असं समजावताहेत. खटल्यातील आरोपी आहेत एक वकील- अॅड. कावेरी. त्यांनीच या कुटुंबांना फसवलंय असा त्यांचा आरोप आहे. अॅड. कावेरी मात्र आपण ती व्यक्ती नाहीए असं ठामपणे ठासून कोर्टाला सांगतेय. आपली केस ती आपणच लढवतेय.
यातल्या नाना देवस्थळी यांच्या आजारी पत्नीची शुश्रुषा करण्यासाठी गंगा ही सेवेकरी त्यांच्या घरात येते आणि घरातल्या सगळ्यांचा विश्वास संपादन करून यथावकाश ती त्यांच्या घरातील सोन्याचा देव्हारा आणि दागदागिने घेऊन पळून गेलीय.
तर जनार्दन स्वामी यांच्या कन्येला- वैैजयंतीमालाला चित्रपटात काम मिळवण्यासाठी नृत्य शिकवण्याकरता यमुनादेवी ही नृत्यांगना त्यांच्या घरी दाखल होते. आणि काहीच दिवसांत त्यांना वीस लाखांना चुना लावून लापता होते.
तिसरं रणजीत देशमुखांचं कुटुंब. त्यांच्या नेहा या मुलीला ह्यसारेगमह्ण विजेती गायिका बनवण्यासाठी गाणं शिकवण्याकरता म्हणून सरस्वती ही गायिका त्यांच्या घरात येते आणि ती नेहालाच घेऊन पसार होते. आणि हे सगळे कारनामे अॅड. कावेरी यांनीच केलेले आहेत असा या सगळ्यांचा आरोप असतो.
यथावकाश खटला उभा राहतो. पण अॅड. कावेरी आपल्या उलटतपासणीने या सगळ्या फिर्याददारांचीच भंबेरी उडवते. हे गुन्हे कावेरीनेच केलेत हे सिद्ध होण्याऐवजी फिर्याददार स्वत:च गोत्यात येतील अशा गोष्टी अॅड. कावेरी समोर आणते. फिर्याददारांचे अॅड. एरंडे कावेरीचा प्रतिवादच करू शकत नाहीत. तिच्यावरील आरोप सिद्ध करणे तर दूरच.
हा कोर्टरूम ड्रामा एकेक केस मांडत पुढे सरकतो. खटकेबाज संवादांनी आपल्याला तो धरून ठेवतो. यातल्या यमुना आणि सरस्वतीची पार्श्वभूमी तपशिलांत उभी राहत नाही. ती घाईघाईत उरकल्यासारखी वाटते. या बाईला कोणी या मंडळींपर्यंत आणलं की ती स्वत:च त्यांच्यापर्यंत पोचली हे कुठंच येत नाही. अशा अनोळखी स्त्रीला आपल्या घरात मुक्त संचार करू देण्याइतपत ती कधी त्यांचा विश्वास संपादन करते हेही नीटपणे येत नाही. बरं, फिर्यादींनी कावेरीला दृष्टिदोषामुळे ओळखले नाही असे नाना देवस्थळींच्या केसमध्ये दाखवलं आहे. पण त्यांची डोळस मुलगी स्मृती हिची साक्षच घेतली जात नाही. त्यामुळे आरोपीची ओळख परेड अपुरीच झाल्यासारखं वाटतं. दुसर्या केसमध्ये जनार्दन स्वामींच्या भानगडी यमुनाला कळतात आणि ती अचानक त्यांना वीस लाखांना चुना लावूून पसार होते असं दाखवलंय. तिर्स या केसमध्येही सरस्वतीबाई त्या कुटुंबाचा नीट विश्वास संपादन करण्यापूर्वीच नेहाला घेऊन पळून जाते. या सगळ्या गोष्टी घिसाडघाईने झाल्यासारख्या वाटतात. बरं, अॅड. कावेरी या मंडळींना उघडं करण्यासाठी हे सगळं करतात असं म्हटलं, तर त्यांना याची माहिती आणि त्यांची प्रकरणं कोणी कळवली हेही गुपितच राहतं. हे रॉबिनहुडछाप उद्याोग करण्यामागचा त्यांचा हेतू सामाजिक बांधीलकीचा आहे असं म्हटलं तर त्यासाठी त्यांनी जो मार्ग पत्करलाय तो वैध म्हणता येणार नाही. वरकरणी त्यांचा हेतू कितीही उदात्त वगैरे असला तरीही तो प्रश्नांकित आहे.
असे सगळे प्रश्न मनात उभे राहत असतानाही ज्या विलक्षण वेगाने घटना-घडामोडी नाटकात घडतात त्यांत प्रेक्षक वाहवत जातो, हे खरे. यातली अॅड. कावेरी यांची उलटतपासणी जरी मूळ मुद्द्याला, आरोपाला सोडून असली तरीही प्रतिपक्षाला निरुत्तर करणारी आहे. त्यात फिर्यादीच उघडे पडत जातात आणि नामोहरम होतात. भीक नको, पण कुत्रा आवर अशी त्यांची स्थिती होते. आजघडीला हे जरी वास्तव असलं तरी न्यायव्यवस्थेत ते मांडलं जाणं आणि न्यायव्यवस्थेनं त्याची तात्काळ दखल घेणं तसं अवघडच. तेव्हा हे नाटक म्हणजे ह्यविशफुल थिंकिंग म्हणूनच त्याकडे पाहायला हवं. असो.
पण तरीही नाटक प्रेक्षकांना बांधून ठेवतं, हे नक्की. आणि ते प्रेक्षकांचं मनोरंजनही करतं. लेखक राजन मोहाडीकर यांनी हा कोर्टरूम ड्रामा चांगला बेतलाय.अर्थात संहितेबद्दल वरील प्रश्न कुणालाही पडूच शकतात. या नाटकात लेखकापेक्षा दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार आणि वेशभूषाकार म्हणून पुरुषोत्तम बेर्डे यांचा मोठा वाटा आहे. वेगवान घटना-प्रसंग, त्यांची तितकीच आकर्षक मांडणी, कलाकारांची यथायोग्य निवड यांत त्यांनी अर्धीअधिक लढाई जिंकली आहे. विशेषत: रसिका वेंगुर्लेकर यांच्या यातल्या चतुरस्रा भूमिका लक्षणीय. त्यांतलं वैविध्य त्यांनी देहबोली आणि संवादोच्चारांतून अप्रतिम दाखवलंय. मोजकंच, पण लवचीक नेपथ्य, नाट्यात्म क्षण अधोरेखित करणारं संगीत, पात्रांना चेहरा देणारी वेशभूषा याचं श्रेय पुरुषोत्तम बेर्डे यांच्याकडे जातं. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेनं नाटकातील मूड्स योग्यरीत्या पकडलेत.
यातल्या बहुतांश कलाकारांची निवड पात्रानुसारी आहे. नाना देवस्थळी झालेले प्रभाकर वर्तक भूमिकेत चपखल बसलेत. त्यांची उनाडटप्पू मुलगी स्मृती- धनश्री पाटील यांनी चोख वठवलीय. बडबड्या नानी म्हणून भक्ती शेठ शोभतात. गणेश रेवडेकर यांचा जनार्दन स्वामी आपल्या करामतींनी धमाल आणतो. त्यांचं वाक्यावाक्यात शिवी देणं आणि मग चेहरा पाडणं लाजवाब. ऋतिका चाळके यांची दाक्षिणात्य वैजयंतीमाला हावभावांसह परफेक्ट. सरंजामशाही वृत्तीचे रणजीत देशमुख दुर्गेश अकेरकर यांनी देहबोलीतून उत्तम साकारलेयत. त्यांची घाबरट पत्नी कमळाबाई प्रतिभा वाले यांनी नेमकेपणाने उभी केली आहे. भक्ती शेठ यांनी उच्छृंखल नेहा साकारलीय. अॅड. एरंडेंच्या भूमिकेत आत्मविश्वासाचा अभाव असलेले, सतत पड खाणारे वकील म्हणून सुनील जाधव आपली छाप सोडतात. बाळ धुरी बर्याच वर्षांनी न्यायाधीशांच्या भूमिकेत शोभून दिसलेत. अॅड. कावेरींची तडफ, त्यांचा आत्मविश्वास, बाजू पलटवण्याची हिंमत रसिका वेंगुर्लेकर यांनी उत्तमरीत्या दाखवली आहे. त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या भूमिकांतही आपला कमालीचा हुन्नर, चतुरस्रा समज आणि त्यानुसारची देहबोली यथायोग्यपणे दर्शविली आहे. त्यांच्यातल्या अभिनेत्रीला हे एक मोठंच आव्हान होतं. पण त्यांनी ते लीलया पेललं आहे. भ्रष्ट इन्स्पेक्टर धांडे पाटील- संदेश अहिरे यांनी त्याच्या लाचारीसह यथार्थ उभा केला आहे. अविनाश कांबळे यांनी परिस्थितीनं पिचल्या गेलेल्या कांबळेची व्यथा समूर्त केली आहे. बाकी कलाकारही चोख.