भाजपाचे नेते आज आरोप करत असले तरी २५ वर्ष आमच्यासोबत असल्यामुळे घोळ काय हे माहित असेल असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईमधल्या खड्ड्यांची किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. मुंबईमध्ये खड्डे आहेत आणि ते बुजवण्याचं काम सुरु आहे असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. "मुंबईमध्ये खड्डे नाहीत असे कधीही आम्ही नाकारलं नाही. हे खड्डे भरताना आम्ही विचारलं नाही की ते एमएमआरडीएचे आहेत की मेट्रोचे आहेत. विरोधकांना हेच कारण घेऊन बोंब मारायची असेल तर मारू दे आपण सगळ्यांनी मिळून मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे," असे किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले. खड्ड्यांच्या कामामध्ये घोळ होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे असे विचारले असता किशोरी पेडणेकर यांनी त्यावर भाष्य केलं आहे. “घोळ त्यांना माहिती. कारण गेली २५ वर्षे आमच्याबरोबरच होते. त्यामुळे त्यांनाच घोळ कळत असेल. मुंबईकरांना चांगले रस्ते आपण देत आलो आहोत. कोणाच्या गालाप्रमाणे रस्ते हवे असं मी म्हणणार नाही. रस्ते नीट असले पाहिजेत जेणेकरुन मुंबईकरांना त्याचा त्रास नको,” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजीचे व प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे. या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबई मनपावर जोरदार टीका केली जात आहे. शिवाय, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना व मुंबईच्या महापौरांवर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेतून शिवसेना व मुंबई मनपावर जोरदार टीका केली. “वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असं शेलार यांनी यावेळी म्हटले.