मुंबई : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीवरून विधानपरिषदेत बुधवारी गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.अनुदान मिळत नसल्याने या शाळांमधील शिक्षकांना पगार मिळत नाही. या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे, असा मुद्दा कपिल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, कायम विनाअनुदानित शाळांच्या उल्लेखातून कायम हा शब्द बारा वर्षांपूर्वी वगळण्यात आला. मात्र अनुदानापोटी निधी देण्यात आला नाही. भाजप सरकारने या शाळांना दरवर्षी २० टक्के टप्पा अनुदान देऊन पाच वर्षांत १०० टक्के अनुदानावर आणण्याचा निर्णय घेतला, मात्र एकदाच २० टक्के निधी दिला. विक्रम काळे यांनीही हा दीर्घकाळ रखडलेला प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. या मुद्दय़ावर अनेक सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करून गदारोळ केल्याने सभापतींनी दोन वेळा कामकाज तहकूब केले.