विरारमध्ये मध्यमवर्गीयांसाठी साडेपाच हजार घरांच्या प्रकल्पाला म्हाडाने सुरुवात केली असतानाच तिसऱ्या टप्प्यात आणखी हजार घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. विकास आराखडय़ातून या बांधकामाला मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत म्हाडा आहे.
विरार पश्चिम येथील ४७ हेक्टरची जागा राज्याकडून मिळाल्यावर म्हाडाने १४ हेक्टरमध्ये ५० इमारतींमधून ५३९९ घरांच्या बांधकामाचा पहिला टप्पा सुरू केला आहे. सध्या बारा इमारतींचे सात मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. एलआयजीसाठी ३३०.२४ चौ. फूट तर एमआयजीसाठी ६५३.७० चौ. फुटांच्या या घरांची ३१ मे रोजी सोडत काढण्यात येऊन घरांचा ताबा २०१६ मध्ये देण्यात येणार आहे.
प्रकल्पाशेजारीत १२ हजार चौरस मीटर व १८ हजार चौरस मीटरच्या दोन जागांवरही घरे बांधण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. सध्याच्या अंदाजानुसार तिथे सुमारे एक हजार घरे उपलब्ध होतील. त्यासाठी विकास आराखडय़ात बदल आवश्यक आहे. ‘याची परवानगी मिळाल्यावर आराखडा तयार होऊन घरांची एकूण संख्या समजेल,’ असे कोकण बोर्डाचे कार्यकारी अभियंता पुष्कर सक्सेना म्हणाल़े