देवनार कचराभूमीतील आग आटोक्यात आली असली तरी त्यामुळे झालेल्या प्रदूषणाचे परिणाम मुंबईकरांना बराच काळ भोगावे लागणार आहेत. पूर्व उपनगरात लागलेल्या या आगीमुळे शहरातील हवेत वाढलेले प्रदूषक घटकांचे प्रमाण येत्या तीन दिवसांतही सुरक्षित पातळीखाली येण्याची शक्यता नाही.
समुद्राच्या सान्निध्यामुळे प्रदूषणापासून बचावणाऱ्या मुंबईला कचराभूमीत लागलेल्या आगीने प्रदूषणात दिल्लीच्या धोकादायक पातळीलाही मागे टाकले.
समुद्रावरून आलेले वारेही मुंबईची हवा पुन्हा स्वच्छ करू शकलेले नाहीत. पश्चिम उपनगरांपैकी बोरीवली, मालाड, वरळी तसेच कुलाबा येथील हवा समाधानकारक पातळीवर येत असली तरी समुद्रकिनाऱ्यापासून तुलनेने दूर असलेल्या पूर्व उपनगरे तसेच नवी मुंबईत मात्र मंगळवारीही सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा तिपटीने जास्त होते. या प्रदूषणासाठी २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे धूलिकण कारणीभूत ठरले आहेत. १० मायक्रोमीटरपेक्षा लहान असलेल्या धूलिकणांची संख्या तुलनेने कमी झाली आहे, तसेच कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड तसेच ओझोनचे प्रमाण सुरक्षित पातळीवर होते. या दिवसांमध्ये वारा पडलेला असल्याने प्रदूषित हवा वाहून नेण्याची नैसर्गिक यंत्रणाच बंद पडली आहे.