कमला मिलमधील आगीप्रकरणी पब मालकासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून १४ लोकांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळाला सचिन अहिर यांनी भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अहिर यांनी केली. कमला मिलच्या कंपाऊंडमधील ‘१ अबव्ह’ रेस्तराँ आणि पबला मध्यरात्री भीषण आग लागली आणि त्यामध्ये १४ लोकांचा नाहक मृत्यू झाला. या घटनेबाबत अहिर म्हणाले, या पबबाबत स्थानिक लोकांच्या मोठयाप्रमाणात तक्रारी होत्या. या परिसरामध्ये अवैध बांधकामेही असून फायरच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते. परंतु मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा भीषण प्रकार घडला असून यामध्ये पबमालकावर गुन्हा दाखल कराच परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे असे प्रकार वारंवार घडत असून लोकांना नाहक बळी पडावे लागत आहे. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये बळी पडलेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेल्या लोकांच्या दु:खात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे असे अहिर यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai kamala mills compound fire ncp demands strict actions against bmc officials
First published on: 29-12-2017 at 17:27 IST