शहरातील दमट, घाम गाळायला लावणाऱ्या हवेपासून सुटका करण्यासाठी मुंबईकर थंड हवेच्या महाबळेश्वरची वाट धरतात. पण मंगळवारी सकाळी मुंबई महाबळेश्वरएवढीच थंड झाली होती. या दोन्ही ठिकाणी किमान तापमान १३ अंश सेल्सिअसवर आले होते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश केल्याने सर्वत्रच पारा खाली घसरला असून, राज्यात सर्वात कमी तापमान, नाशिक येथे ७ अंश से. राहिले.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तरेतील थंड वाऱ्यांनी अधिक वेगाने राज्यात प्रवेश केला. त्यामुळे सर्वच भागांतील किमान तापमानात घसरण झाली. त्याचा अधिक प्रभाव नाशिक, पुणे, मुंबईत अनुभवायला मिळाला. मंगळवारी सांताक्रूझ येथे १३.४ अंश से.पर्यंत तापमान उतरले होते. या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. कुलाबा येथे मात्र किमान तापमान २०.४ अंश से.पेक्षा खाली आले नाही. आतापर्यंत वारे ईशान्य दिशेने येत होते. मात्र आता उत्तरेकडून येणारे वारे अधिक प्रभावी ठरत आहेत. जमिनीवरून येणाऱ्या या कोरडय़ा, थंड वाऱ्यांमुळे तापमानात घसरण झाली आहे, पुढील दोन दिवसांत तापमानात किंचित वाढ अपेक्षित आहे, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
घामाच्या धारांची सवय असलेल्या मुंबईकरांना मंगळवार सुखद गेला. कुलाबा येथे २८.१ अंश से. तर सांताक्रूझ येथे २८.८ अंश से.पर्यंतच तापमानाने कमाल मर्यादा गाठली. संध्याकाळी या दोन ठिकाणी अनुक्रमे २८ व ३४ टक्के सापेक्ष आद्र्रता होती. बाष्पाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने गारठा अधिक जाणवत होता.