मुलांच्या रडण्याचा आवाज सहन न झाल्याने अवघ्या एका महिन्याच्या दोन जुळय़ा तान्हुल्यांची आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली. मातृत्वाला कलंक लावणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणारी ही घटना बुधवारी दुपारी नवीन पनवेल येथे घडली. शारदा दीपक सोनार (३५) असे या वैरिणीचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही महिला लग्नापूर्वी अंगणवाडीमध्ये चिमुरडय़ांना शिकवण्याचे काम करत होती.
नवीन पनवेल येथील सेक्टर सात मधील दत्तकृपा सोसायटीत राहणाऱ्या शारदाला १ मार्चला जुळी मुले झाली. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असतानाच शारदाने हे निर्घृण कृत्य केले. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शारदाने दोन्ही मुलांना बाथरुममधील पाणी भरलेल्या टाकीत बुडवून त्यांची हत्या केली. त्यावेळी झोपलेल्या सासूने उठल्यानंतर ‘मुले कुठे आहेत’ असे विचारले असता शारदाने तिला पाण्याची टाकी दाखवली. घडला प्रकार पाहून हादरलेल्या तिच्या सासूने शेजाऱ्यांना बोलावले व पोलिसांनाही कळवण्यात आले. शारदाचे तिचा पती दीपक याच्याशी मागील काही दिवसापासून भांडण सुरू होते. हेही तिच्या या कृत्याचे कारण असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.