प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांची कर्करोगासोबतची झूंज शुक्रवारी रात्री अखेर संपली. अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेले अनेक दिवस आदेश यांच्यावर उपचार सूरू होते. परंतु, त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांच्यावरील केमोथेरीपीचे उपचारही थांबवले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे दोन मुलं आहेत. २०१० साली त्यांना कॅन्सर असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी उपचार घ्यायला सुरवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये आजार बळावल्याने ऐश्वर्या राय, शाहरुख खान यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांनी अंधेरी येथील रुग्णालयात आदेश यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला. अनेक चित्रपटांची गाणी आदेश यांनी संगतीतबद्ध केली आहेत. कभी खूशी कभी गम, राजनिती, चलते चलते व इतर सुपरहिट चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथे दुपारी साडेबारा वाजता अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.