पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नाकर्तेपणामुळे सरदार सरोवर धरणाला दरवाजे बसविण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान होत असून हक्काची असलेली मोफत वीज राज्याला मिळत नाही, असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केला. देशाचे सामथ्र्य आणि प्रगती जगाला दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करीत मोदी यांनी गुजरातने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीचे दाखले दिले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संघराज्य पध्दतीचे मोठे नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
न्यूयॉर्कमधील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याहून (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी) अधिक उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘एकता आणि मानवता’ (स्टॅच्यू ऑफ युनिटी अँड ह्यूमॅनिटी) यांचे प्रतीक असलेला जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात येईल. शांघायच्या सहापट आणि दिल्लीच्या दुप्पट क्षेत्रफळ असलेले ‘ढोलेरा’ हे अत्याधुनिक सेवा सुविधा आणि यंत्रणा असलेले नवीन शहर गुजरातमध्ये वसविले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्यात येत असून हे स्वप्न मी साकारणारच, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गुजरातचा कृषीदर देशाच्या दुप्पट आहे. कच्छच्या वाळवंटात हरितक्रांती घडविली आहे, असे अनेक दाखले देत देशातही हे घडविता येईल. गुजरातच्या जनतेने जे करून दाखविले, ते देशाच्या जनतेनेही केले, तर ही प्रगती देशातही होईल, असा आशावाद मोदी यांनी व्यक्त केला. सरदार सरोवर धरणाला दरवाजे बसविण्यास केंद्राची परवानगी न मिळाल्याने गुजरात सरकारला हे काम करता आलेले नाही. पंतप्रधानांची त्यासाठी अनेकदा भेट घेतली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न असेल, तर तो सुटेपर्यंत दरवाजे बसविले तरी ते बंद करून पाणीसंग्रह केला जाणार नाही, असे आश्वासन देऊनही केंद्र सरकार पावले टाकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला वीजेला मुकावे लागत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
इंडियन र्मचट्स चेंबरतर्फे मोदी यांच्याशी चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयात चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी गुजरात राज्य निर्माण केले गेले, तेव्हाची परिस्थिती आणि आजचे चित्र यांची तुलना करणारी उदाहरणे दिली.