स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रत्येक वेळी मित्रपक्षाला गृहीत धरण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही वैतागले आहेत.
राहुल गांधी यांच्यामुळे मागे केंद्रीय मंत्रिमंडळाला आपला निर्णय बदलावा लागला होता. आता राज्य मंत्रिमंडळावर तीच गत आली आहे. राजकारणात भविष्यातील निर्णयांचा विचार करून मगच पाऊल टाकायचे असते याची बहुधा राहुल गांधी यांना कल्पना नसावी, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. ‘आदर्श’चा अहवाल फेटाळण्याचा निर्णय हा पूर्णपणे काँग्रेस पक्षाचा होता. मुख्यमंत्री तसा स्वत:हून निर्णय घेण्याची शक्यता नाही. नवी दिल्लीतूनच तसा निर्णय झाला असावा. मग हा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करण्यात का आली नव्हती, असा सवालही पटेल यांनी केला.
अहवालाचा फेरविचार करण्यास आमचा कधीच विरोध नाही. पण त्यातून आघाडी सरकारबद्दल चुकीचा संदेश गेला. मिलिंद देवरा यांच्या मागणीनुसार विधिमंडळात चर्चा करण्याचीही आमची तयारी असल्याचेही पटेल म्हणाले.
राज्यातील जागावाटपावरून काँग्रेसने घेतलेल्या कठोर भूमिकेमागे राहुल गांधी हेच कारणीभूत असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अंदाज आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका लपून राहिलेली नाही.