देशातील आणि राज्यातील कॉंग्रेसचे सरकार हटविण्याची शेवटची संधी आली आहे. गाफील राहू नका. मर्द शिवसैनिकच देशाला आणि राज्याला मजबूत सरकार देऊ शकतात, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील शिवसैनिकांना शिवबंधनाची प्रतिज्ञा दिली. देशाच्या उंबरठ्यावर अराजक दिसते आहे. कॉंग्रेस सरकारचा हा देशातील शेवटचा प्रजासत्ताक दिन ठरणार असल्याचा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शिवसैनिकांना शिवबंधनाचा धागा बांधण्याचा आणि प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, सध्या हिंदूस्थानात हिंदू असणे, गुन्हा ठरवला जातो आहे. पण मी हिंदू आहे. त्याबद्दल मला गुन्हेगार ठरवले तरी हरकत नाही. कॉंग्रेस कायमच सांप्रदायिक शक्तींच्या नावाखाली फोडा आणि राज्य करा, या पद्धतीचा वापर करीत आली आहे. मात्र, यावेळी गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक शिवसैनिकाने घराघरांत जाऊन कॉंग्रेसचा खोटेपणा उघड केला पाहिजे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीने पंतप्रधानपदासाठी चेहरा दिला आहे. मात्र, कॉंग्रेसवाले अजून त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करायला तयार नाहीत. राहुल गांधी यांचे नाव जाहीर करणार होते. पण केले नाही. बळीचा बकरा बनायला त्याच्या पक्षामध्ये कोणीच तयार नाही. पुढचा पंतप्रधान शिवसेना, भाजप युतीचाच असणार, असे ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानांवर निशाणा साधताना ते म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या इतका दुबळा पंतप्रधान आतापर्यंत बघितला नाही. पंतप्रधानांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही, मग देशात कोण विचारणार? लाल किल्ल्यावरून केलेले त्यांचे हे शेवटचेच भाषण असणार आहे. पुढच्या वर्षी पंतप्रधानपदी आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना, भाजप युतीचा नेताच बसलेला असेल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलही आनंदी आनंदच आहे असे सांगून ठाकरे म्हणाले, त्यांच्या पक्षातील नेतेच म्हणतात. पृथ्वीबाबांचे काम म्हणजे ‘ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट खल्लास!’ काही कामच करत नाहीत. स्वतः नुसते स्वच्छ असून काय उपयोग, सरकारमधील बाकीच्या बरबटलेल्यांना तुरुंगात कधी टाकणार. आदर्शच्या चौकशीला सात कोटी खर्च झाले. कोणाचा पैसा खर्च झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसैनिकांना प्रतिज्ञा देणार म्हटल्यावर काही जणांच्या पोटात गोळा आला. प्रतिज्ञा घेण्यासाठी किती विराट संख्येने शिवसैनिक जमले आहेत, हे दाखविण्यासाठीच दिवसा उजेडी सभा घेतली. काळोखात काही कळत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
कॉंग्रेसला हटविण्याची शेवटची संधी, गाफील राहू नका – उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
देशाच्या उंबरठ्यावर अराजक दिसते आहे. कॉंग्रेस सरकारचा हा देशातील शेवटचा प्रजासत्ताक दिन ठरणार असल्याचा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
First published on: 24-01-2014 at 12:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next prime minister will be from shivsena bjp alliance says uddhav thackeray