राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी राज्यामधील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी शिंदे सरकारकडे केली. जवळजवळ तासभर सुरु असणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन मंत्र्यांच्या मंत्रीमंडळ बैठकीवर उपहासात्मक पद्धतीने भाष्य केल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये काम झालं नाही असा ठपका या सरकारने ठेवलाय असं म्हणत पत्रकार प्रश्न विचारत असतानाच अजित पवार यांनी हात वर करुन ‘अजिबात नाही, अजिबात नाही’ म्हणत पत्रकाराला थांबवलं. “ग्रामीण भागामध्ये त्याचं काम चांगलं झालं. मी स्वत: देवेंद्रजींचं वक्तव्य ऐकलं, तुम्ही गडबड करु नका” असंही अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत मग…”; शहाजीबापू पाटलांनी अगदी डोक्याला हात लावून आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न

पुढे अजित पवार यांनी उपहासात्मक पद्धतीने, “त्या दोघांच्या मोठ्या बैठकीमध्ये त्यांनी त्याची चर्चा केली आणि आढावा घेतला,” असं वक्तव्य केलं.
“तुम्ही विचार करा ना, त्या कॅबिनेटमध्ये ४५ खुर्च्या असतात त्या टेबलभोवती. त्याच्यात ते दोघे पूर्णपणे चर्चा करतात. बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं काय करता काय नाही,” असं म्हणत हसून टाळी वाजवली. पुढे अजित पवार यांनी, “त्याच्यामुळे त्यांच्यावर एवढं टेन्शन असतं खाली खुर्च्यांचं. आपण चुकू नये बरं का दोघं चुकू नये…” असं म्हटलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

नक्की वाचा >> “…तर मी त्यांच्यासोबत उभी राहील”; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटातील आमदाराला सुप्रिया सुळेंची ऑफर

“त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागांमध्ये काम झालेलं आहे. शहरी भागांमध्ये काम झालेलं नाही. आता यामध्ये काम चांगलं झालेलं नाही तर जबाबदार कोण आहे? त्यावेळेचं सरकार. त्यावेळेच्या सरकारमध्ये शहरी भागात कोण काम करतं होतं? नगरविकास खातं. मग नगरविकास खातं कोणाकडे होतं? एकनाथराव शिंदेंकडे. निर्णय कोण घेतायत? राज्याचे मुख्यमंत्री. आता आपणच बघा आपल्याला पटतं का हे?” असा प्रश्न पत्रकारांनाच विचारला.

नक्की वाचा >> “राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

“ते त्या खात्याचे मंत्री असताना तो आढावा घ्यायला पाहिजे होता. त्यांनी मनात ठरवलं असेल अडीच वर्षांनी मीच होणार आहे मुख्यमंत्री. इथं जरा अडीच वर्ष कमी काम करू. मुख्यमंत्री झाल्यावर जोरात काम करू. म्हणून त्यांनी ते काम मागे ठेवलं असेल,” असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.