मुंबई : राज्य परिवहन (एसटी) मंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचे नियोजन केले होते. परंतु, एसटीला नियोजित वेळेत विद्युत बस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याऐवजी वारंवार कंपनीसाठी कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाटच पाहावी लागणार आहे.
इंधन दरवाढीपासून सुटका मिळावी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या विद्युत बसचे लोकार्पण फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आले. त्यानंतर एसटी महामंडळाने ५,१५० वातानुकूलित विद्युत बस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असत्या तर राज्यातील प्रवाशांना नव्याकोऱ्या बसचा आनंद घेता आला असता. परंतु, मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विद्युत बस पुरवठादार कंपनीकडून एसटीला नऊ मीटर लांबीच्या १३८ व १२ मीटर लांबीच्या ८२ अशा एकूण २२० बस पुरविण्यात आल्या. त्याबाबत कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची घोषणा तीन वेळा करण्यात आली. त्यानंतरही कंपनीला बस पुरविण्याबाबत नवीन वेळापत्रक निश्चित करून बस पुरविण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली. त्यामुळे एसटीला वेळेत विद्युत बस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या वल्गना वारंवार करून व्यवस्थापनाने कंपनीला पुन्हा एकदा मुदत दिली आहे. ज्या कंपनीने वेळेवर बस पुरविल्या नाहीत. व त्यामुळे करोडो रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. याशिवाय प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला आहे. त्यामुळ एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याउलट कंपनीवर एसटी महामंडळाकडून पुन्हा नियोजित वेळापत्रक देऊन बस पुरविण्यासाठी कालावधीत वाढ करणे गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.
मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विद्युत बस पुरवठादार कंपनीकडून एसटीला नऊ मीटर लांबीच्या १३८ व १२ मीटर लांबीच्या ८२ अशा एकूण २२० बस पुरविण्यात आल्या. यादरम्यानच्या कालावधीत एसटी महामंडळाने कंपनीशी २५ पेक्षा जास्तवेळा पत्रव्यवहार आणि बैठका घेऊन बसचा पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ च्या करारानुसार, ४ हजार बस येणे अपेक्षित होते. नवीन वेळापत्रकानुसार २२ मे २०२५ पर्यंत १,२८७ बस पुरविण्यात याव्यात, असे इशारा पत्र दिल्यानंतर मुदत संपूनही कोणतीही सुधारणा झाली नाही, असे बरगे यांनी सांगितले.