पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला असा आरोप करत आज माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. ते देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी यशस्वी ठरले नाहीत असेही शरद पवार यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले.

देशातल्या अनेक भागात मांसाहार ही खाद्यसंस्कृती आहे. तरीही गोमांस असल्याच्या संशयावरून मॉब लिंचिंग सारखे प्रकार होतात हे दुर्दैवी आहे. मध्यतंरी अशाच एका प्रकरणात एकाकडे गोमांस असल्याच्या संशयावरून त्याला मारहाण झाली. त्या मारहाणीत त्याचा जीव गेला. काही दिवसांनी चौकशीचा अहवाल समोर आला त्यात समजले की हे गोमांस नव्हतेच. मात्र ज्या व्यक्तीचा जीव गेला त्याचे कुटुंब उघड्यावर पडले त्याची जबाबदारी कोणाची? असाही प्रश्न विचारत शरद पवार यांनी कथित गो-रक्षकांवर टीका केली.

इतकेच नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून जर भाजपाकडे जनतेने सत्ता दिली आहे तर त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवल्या होत्या. मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले आहे. मागील चार वर्षांमध्ये देशातली परिस्थिती पाहिली तर एका वेगळ्याच स्थितीतून देश जातो आहे. राज्या-राज्यांमध्ये, माणसांमध्ये, समाजांमध्ये एकवाक्यता कशी राहिल याची काळजी केंद्र सरकारने घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही, समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.