मुंबई : राज्यात गेल्या दोन अडीच वर्षांपासून करोना काळात आरोग्य क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या करोना योद्धयांना सरकारी सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी भरतीमध्ये त्यांना अधिक गुण देण्यात येणार असून त्याबाबत रूपरेषा तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असा आदेश शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यां तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.