मुंबईः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाईत प्रचंड वाढ झाली असून यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. जानेवारी – एप्रिल या चार महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ ६,०३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा >>> गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे काम लांबणीवर; ३० सप्टेंबरची नवी मुदत

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाईबाबतची माहिती दिली होती. यावर्षी सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाया करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीकडून शांतता भंग होण्याची भीती असल्यास संबंधित व्यक्तीवर सीआरपीसी १०७ अंतर्गत कारवाई केली जाते. याशिवाय सीआरपीसी कलम ११० व १५१ (३) अंतर्गत अनुक्रमे २१५४ व ९१६ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (एमपी) कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत अनुक्रमे ३३, १९३ व ९० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय एपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> मुंबईः सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये सीआरपीसी कलम १०७ अंतर्गत ३७५४, सीआरपीसी कलम ११० अंतर्गत १७४३ व १५१ (३) अंतर्गत २४३ कारवाया करण्यात आल्या होत्या. एमपी कायदा कलम ५५, ५६, ५७ अंतर्गत अनुक्रमे २४, १८८ व ८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. एमपीडीए कायद्याअंतर्गत गेल्यावर्षी सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. यानुसार संबंधित व्यक्ती आदेशात नमूद केलेल्या जिल्ह्यात वा परिसरात दिलेल्या कालावधीसाठी प्रवेश करू शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा ६८, ६९, तसेच १५१, दंड प्रक्रिया संहिता १०७, १०९,११० अन्वये पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते.