महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये राज ठाकरेंनी अगदी राज्यातील सत्तांतरणापासून ते नूपूर शर्मांनी केलेल्या विधानावरुन झालेल्या वादापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. याच भाषणादरम्यान राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरुन मिश्कील भाषेमध्ये टीप्पणी केली. सध्याच्या राजकारणासंदर्भात बोलताना राज यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याचा संदर्भ दिला.

नक्की वाचा >> ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

राज ठाकरेंनी पक्ष बदलल्यानंतरही लोक पक्ष बदलणाऱ्यांना मतदान कसं करता याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. “मी गुडीपाडव्याच्या भाषणामध्ये म्हटलं की राजकारणातली माणसं अशी का वागतात. आज या पक्षात गेलो परवा त्या पक्षातून निवडणूक लढवली. मी पैसे घेतले, इकडे गेलो, तिकडे गेलो असं का होतं आहे. निवडणुकीच्या काळात. जिल्हा परिषदा वगैरे या पक्षात तिकीट नाही झालं तर या पक्षातून त्या पक्षात गेलो. मला तर लोकांची कमाल वाटते की यानंतरही ते या लोकांना मतदान करतात,” असं म्हणत राज यांनी सध्याच्या पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली.

राज यांनी आपल्या भाषणामध्ये २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं. तसेच राज यांनी उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपद अर्ध अर्ध वाटून घेण्यासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांबद्दल शंका उपस्थित केली. त्यावेळी निवडणूक प्रचारामध्ये मोदी भाषणात सांगतायत सत्ता येईल त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं म्हणाले होते तेव्हा उद्धव ठाकरे स्टेजवर बसले होते. मोदींनंतर अमित शाह जाहीर भाषणात म्हणाले होते फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्याचवेळी आक्षेप का घेतला नाही? तेव्हाच का बोलला नाहीत? फोन का केला नाही? असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली. त्याचप्रमाणे पुढे राज यांनी, सर्व निकाल लागल्यावर यावर तुम्हाला आठवलं. म्हणजे याची बोलणी सुरु आधी असणार, असंही म्हटलं.

नक्की वाचा >> …अन् राज ठाकरेंनी हातानेच इशारा करत वसंत मोरेंना स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितलं; वसंत मोरे म्हणतात, “मी हो म्हटल्यानंतर…”

महाविकास आघाडी सरकारची स्थापना ही मतदारांशी प्रतारणा होती अशी टीकाही राज यांनी केली. “मग काय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार. भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-एनसीपीला मतदान करणाऱ्यांना काय वाटलं असेल? ते नको म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, असं झालं असणार मतदारांचं,” असा टोला राज यांनी लगावला. पुढे राज यांनी राजकारण्यांवर टीका केली. “ही हिंमत होते कशी? ही हिंमत तेव्हाच होते जेव्हा लोक या गोष्टीला शासन करत नाही. जनता यांना शिक्षा करत नाहीत. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही अशी भूमिका मतदार घेत नसल्याने ही हिंमत होते. तुम्ही आमच्या मताची किंमत करत नाही. दोन दोन तास रांगेत उभे राहून मतदान करतो आणि तुम्ही त्याच्याशी प्रतारणा करता. जोपर्यंत लोक, महाराष्ट्रातील जनता हे ठरवत नाही, हे सांगत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशीबी हे असच राहणार,” असंही राज आपल्या भाषणात म्हणाले.

नक्की वाचा >> राज ठाकरेंनी केलं नुपूर शर्मांचं समर्थन; झाकीर नाईकचा उल्लेख करत म्हणाले, “झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत…”

“काही राजकारणाचा आणि या जगण्याचा एकूणच सगळ्याचा कशाला काही संबंध नाही. राजकारण इतका गंभीर विषय आहे. आताच्या सरकारच्या भाषेमध्ये, ‘आपण त्याला खेळाचा दर्जा दिला आहे’ दहीहंडीला देतच आहोत,” असं म्हणत राज यांनी राजकारणाचा खेळ झाल्याचा टोला लगावला. “काय कोजागिरीला… काय तर म्हणे मंगळागौरला खेळाचा दर्जा. खरं तर लग्न झाल्या झाल्या दिला पाहिजे त्याला खेळाचा दर्जा,” असा टोला राज यांनी वरमाला घालण्याचे हताने इशारे करत लगावला. राज यांच्या या विधानानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला. आपण राजकारणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आजसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं निरिक्षणही राज यांनी आपल्या भाषणात नोंदवलं.