अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या भोंगळ आणि बेशिस्त कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. महामंडळाच्या २०११-१२ या आर्थिक वर्षांतील हिशेबाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. महामंडळाची २०१२-१३ या वर्षांतील पहिली सभा २० मे व  दुसरी सभा १५ जुलै २०१२ रोजी झाली. या दोन्ही बैठकांमध्ये हिशेबाला मंजुरी मिळविण्याची रितसर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
महामंडळाचे कोषाध्यक्ष गुरुनाथ दळवी यांनी सर्व सदस्यांना एकत्रित हिशेब पाठवले होते. पण सर्वच सदस्यांनी हिशेबातील तपशीलाची मागणी केल्यामुळे या हिशेबांवरील चर्चा पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. पुढील बैठक १५ जुलै रोजी झाली पण त्या बैठकीतही हिशेबाला मंजुरी मिळू शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
म्हणजेच २०११-१२ या आर्थिक वर्षांत जो काही खर्च झाला, त्याला अद्यापही मान्यता मिळालेली नाही. येत्या तीन महिन्यात सध्या सुरू असलेले आर्थिक वर्षही संपेल. मात्र तरीही २०११-१२ या आर्थिक वर्षांतील हिशेब मंजूर झालेले नाही.
या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
खर्चाचा तपशील लवकरच सादर केला जाईल आणि ठराव करून त्याला मंजुरीही घेण्यात येईल. चिपळूण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाच्या होणाऱ्या बैठकीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील हिशेबाला मान्यता मिळेल, असे त्या म्हणाल्या.