जीप चालकांच्या समयसूचकतेमुळे अनेकांचे प्राण वाचले
मुसळधार कोसळधारा पाऊस.. त्यात चहूबाजूला पसरलेला लख्ख अंधार.. यावर केवळ गाडीच्या हेडलाइटच्या भरवश्यावर सुरू असलेली वाहतूक.. मात्र काही क्षणांतच समोर वेगाने धावणारी गाडी तितक्याच वेगाने मागे येत असल्याचे पाहिले आणि कसलाही विचार न करता एसटी मागे घेतली. आणि जणू ५० मीटर अंतरावर हात जोडून उभा असलेल्या मृत्यूला कलाटणीच देण्यात आली. त्यामुळे एका खासगी जीप गाडी आणि एसटीचे चालक संजय केदार यांच्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले.
रायगड जिल्ह्य़ातील सावित्री नदीवर गेले शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या खाणाखुणा घेऊन उभ्या असलेल्या पुलावर मंगळवारी रात्री काळाने हल्ला चढवला. पुल कोसळल्याने दोन एसटी गाडय़ा आणि सात ते आठ खासगी वाहने वाहून गेले. यात अनेक प्रवासी नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाले. यानंतर संपूर्ण जिल्ह्य़ावर शोककळा पसरली. मात्र याच रात्री भर अंधार पसरलेला असताना एका जीप आणि एसटी चालकांच्या सर्तकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले आहे.
गुहागरहून बोरिवलीला जाण्यासाठी संदेश केदार यांनी एसटी गाडी सुरू केली. एकएक टप्पा मागे टाकत केदार यांनी पोलादपूरला जेवणाची विश्रांतीसाठी गाडी थांबवली. यानंतरचा टप्पा होता. तो म्हणजे ‘महाड’चा. गाडी वेगात महाडच्या दिशेने निघाली. चहूबाजूला पसरलेला अंधार कापत एसटी पुढे जात होती. अचानक मागून पुढे गेलेली जीप ज्या वेगाने पुढे गेली. त्याच वेगात मागे येऊ लागली. यावर एसटी चालकाचा गोंधळ उडणे स्वाभाविक. कारण ज्या पुलावरून एसटी आणि जीप गाडी पुढे जाऊ पाहत होती. त्याचा पुढचा अख्खा भागच नदीने जणू गिळला होता. साडेअकराच्या सुमारास घडलेल्या अपघातानंतर दहा मिनिंटानींच मागून येणाऱ्या सर्व गाडय़ा या नदीत कोसळल्या असत्या. मात्र एसटी आणि विशेषत: जीप चालकाच्या सर्तकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले असल्याचे सांगण्यात आले.