शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त (शुक्रवार, १७ नोव्हेंबर) त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) गुरुवारी रात्रीपासूनच बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, तसेच घोषणाबाजीदेखील केली. तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात हा गोंधळ चालू होता. या राड्याप्रकरणी आता दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक असल्याचं ठाकरे गटातील नेत्यांनी म्हटलं आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी खासदार राऊत म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिथे (शिवतीर्थ) जो काही संघर्ष झाला त्यानंतर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करताय. ही गृहमंत्रालयाची विकृती आहे. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर आम्ही पाहू काय करायचं. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे करताय.
खासदार राऊत म्हणाले, शिवतीर्थावर गद्दारांना रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. आता तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करून तुमची विकृती उघड केली आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष चालूच राहील. न्यायलयात आणि रस्त्यावरही संघर्ष चालू राहील. बेईमान गटातील ज्या महिला आत घुसल्या त्यांची भाषा आणि भूमिका पाहा त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली ते सांगा. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही? की त्यांना कोंडून ठेवून दुसरंच कोणीतरी राज्य करतंय आणि गृहमंत्रालय चालवतंय हे आता पाहावं लागेल