मुंबई : राज्यात उन्हाच्या कडाक्यामुळे पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होऊ लागले आहे. ग्रामीण भागात दररोज पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली असून सध्या ५७ तालुक्यांतील १०१९ गावे- वाडय़ांमध्ये २७० टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच टँकरपुरवठय़ाचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाणीपुरवठय़ासाठी तातडीने ४६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव  संजीव जयस्वाल यांनी राज्यातील पाणीटंचाई निवारणार्थ राबिवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती या वेळी दिली. ग्रामीण भागात अनेक जलस्रोत आटत असल्याने गाव-वाडय़ांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आजमितीस  कोकणात ११ गावे, ३६६ वाडय़ांना ७८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. अशाच प्रकारे  नाशिक विभागात ७३ गावे, ८६ वाडयांना ७२ टँकरमार्फत तर पुणे विभागात ५५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर विभागात मात्र अजून एकाही गावात पाणीटंचाईची समस्या नसल्याची माहिती या वेळी  देण्यात आली. जेथे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठय़ासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अर्धवट पाणीपुरवठा योजना तातडीने पुर्ण करणे, बंद योजनांची दुरुस्ती करणे यासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून येत्या काळात टँकरची मागणी ५०० पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याची माहितीही या वेळी देण्यात आल्याचे समजते.