राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून शनिवारी महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चानंतर भाजपा-शिंदे गटाकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात आली. हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच या मोर्चापेक्षा आमची कोकणातली सभा मोठी होती, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच या महामोर्चात येण्यासाठी लोकांना पैसे दिले गेले, असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला होता. दरम्यान, शिंदे गट-भाजपाच्या टीकेला आता शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या ‘सामाना’तून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “आपल्या चोर कंपनीला…”, घाबरू नका म्हणत संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“शिवसेनेसह महाविकास विकास आघाडीचा धडक मोर्चा शनिवारी मुंबईत निघाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो महाराष्ट्रप्रेमी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मात्र, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा होता, मुळात ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही, त्यांच्या डोळ्य़ांत ‘मराठी द्वेषा’चा वडस वाढला आहे, असेच म्हणायला हवे. शनिवारचा मुंबईतील भव्य मोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती”, असं प्रत्युत्तर शिवसेनेने ‘सामाना’च्या माध्यमातून दिले आहे.

“सातत्याने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे सरकार मूकबधिर होऊन बसले आहे. कारण दिल्लीने त्यांना गुंगीचे इंजेक्शन टोचून पाठवले आहे. या गुंगीचा असर ओसरला की, पुढचे इंजेक्शन देऊन सरकारला झोपवून ठेवले जाते. अशा गुंगीने बधिर झालेल्यांच्या पेकाटात लाथ घालून जागे करण्यासाठी मुंबईतील मोर्चा एका त्वेषाने निघाला होता. तेव्हा हा मोर्चा ‘फेल’ होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल”, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

“मुंबईतला शनिवारचा महामोर्चा टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून ‘गुंगाराम’ सरकारने नाना खटपटी, लटपटी केल्या. या बेकायदा सरकारने नियम, कायद्याचे, अटी–शर्तींचे कागदी भेंडोळे नाचवले. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडतच राहतील. नापास, बेकायदा सरकार काय म्हणते आहे, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मोर्चा यशस्वी झाला. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे फडणवीस यांनी तळमळून सांगितले की, मोर्चा फेल झाला! याचाच अर्थ मोर्चा भव्य होता. हा मोर्चा यशस्वी झाल्याने सरकार टरकले आहे. या मोर्चाने मिंधे–फडणवीस सरकारला नोटीस दिली आहे. तुमचा बेकायदा इमला कोसळत आहे”, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena replied to shinde fadnavis government after criticism of mahavikas aghadi mahamorcha spb
First published on: 19-12-2022 at 07:50 IST