विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठं, महाविद्यालयं आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. यामध्ये एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. या परीक्षांसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर मंगळवारी राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली.

सामंत म्हणाले, “या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुलपती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

या बैठकीत पदवी आणि पदव्युत्तरच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा १ ते १५ जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) २० ते ३० जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील का? आणि या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करून १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? तसेच लॉकडाउनचा लावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

त्याचबरोबर तसेच कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल तसेच एकदम शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी, एम. फिल व पी. एचडीच्या मुलाखती कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतू, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितलं.

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचनाही यावेळी सामंत यांनी दिल्या.

सीईटी परीक्षेसंदर्भात समितीची निर्मिती

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असेही सामंत यांनी संगितले.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सध्या असलेलं जिल्हा स्तरावरील सीईटी केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक तालुका स्तरावर तयार करण्यात याव्यात. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला राज्यातील सर्व विद्यापीठांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या आकस्मित निधीतील काही रक्कम आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभारही सामंत यांनी यावेळी मानले.