‘म’ मीनाक्षी शेषाद्रीचा, ‘म’ माधुरीचा, ‘म’ मनिषा कोईरालाचा, ‘म’ महिमा चौधरीचा..अशा ‘म’कारान्त अभिनेत्री शिवाय चित्रपट न करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक सुभाष घईंना इंडस्ट्रीत इतकी वर्ष झाली आहेत. पण अजून त्यांचा ‘म’चा ध्यास संपलेला नाही.
२००८ सालचा युवराज सपशेल आपटल्यानंतर घईंनी आता नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा ‘म’चा आधार घेतला आहे. त्यांच्या कांची या नव्या चित्रपटाच्या नव्या अभिनेत्रीचे नाव मिष्टी आहे. आणि चित्रपटाचा शुभारंभ करताना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यावर भर देण्याऐवजी घई ओरडून ओरडून आपल्याला ‘मिष्टी’ नावाची अभिनेत्री मिळाली असल्याची जाहिरात करत सुटले आहेत.
 घईंना आपल्या चित्रपटाला हमखास यश मिळावे यासाठी त्यांच्या जुन्या ‘म’ फॉम्र्युल्याची आठवण झाली आहे.
मीनाक्षीचा ‘हिरो’, माधुरीचा ‘खलनायक’ आणि ‘राम लखन’, मनिषा कोईरालाचा ‘सौदागर’ आणि महिमा चौधरीचा ‘परदेस’ हे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले होते. तर ऐश्वर्याला घेऊन केलेला ‘ताल’ आणि कतरिनाला घेऊन केलेला ‘युवराज’ दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर असे आपटले की घईंनी दिग्दर्शनच काही काळापुरती बंद केले होते. म्हणून कांची या नव्या चित्रपटासाठी त्यांनी मिष्टी या बंगाली अभिनेत्रीला नायिका म्हणून संधी दिली आहे. तर कार्तिक तिवारी हा चित्रपटाचा नायक आहे.