मुंबई : धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबंध काय, तो गायब झाला आहे की त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरक्षित स्थळी ठेवले आहे, असे सवाल करीत त्याच्याविरुद्ध राज्य शासनाने गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे देण्याची मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी केली. परराज्यातून तो व्यवहार हाताळीत असल्याने आंतरराज्य प्रकरणाचा तपास सीबीआयला द्यावा, असे सांगून शेलार म्हणाले, अमली पदार्थ आणि बदल्यांमधील गैरव्यवहार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दररोज खोटे आरोपसत्र राबविले. अनेक गुन्हे दाखल असलेला दाऊदचा हस्तक रिंकू पठाण याला टाळेबंदीकाळात सोडण्यात आले. पठाण याने टाळेबंदीकाळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन देवघेवीचा सौदा केला. रिंकू पठाण भेटल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी हळूहळू धागेदोरे जमा करून अमली पदार्थांच्या तस्करीत सामील असलेल्या २० वितरकांना अटक केली. ही माहिती एनसीबीने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ला दिली. म्हणून एनसीबीवर आरोप करण्यात आले. पाटील हा बदल्यांमधील दलाल असून सीबीआयने मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा थयथयाट सुरू आहे. त्यामुळे पाटील याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे, असा आरोप शेलार यांनी केला.