ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी विभागातील शिक्षकांचा अनुशेष भरण्यासाठी बिगरआदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या एकाच वेळी करण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो शाळांना टाळे ठोकण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी घेतला आहे.
शिक्षकांच्या या बदल्यांबाबत ३१ मे रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रातही या बदल्यांविरोधात इशारा दिला होता. तरीही सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सोमवारी अंबरनाथ तालुक्यातील १२० तर कल्याण तालुक्यातील ७० शाळांना टाळे ठोकणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारने यंदा आदिवासी विभागातील शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरली. मात्र त्यामुळे भिवंडी, कल्याण व  अंबरनाथ तालुक्यातील शिक्षकांची २४५ पदे रिक्त झाली.
या बदल्यांमुळे अंबरनाथ तालुक्यातील डोणेवाडी तसेच गोरेगांव तर कल्याण तालुक्यातील पाच शाळांमध्ये एकही शिक्षक उरलेला नाही.