मुंबई: सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास प्रवाशांच्या वाढत्या विरोधानंतर मध्य रेल्वेने दहा वातानुकूलित फेऱ्या पुन्हा सामान्य लोकल फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वातानुकूलित फेऱ्या या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. दहा सामान्य लोकल फेऱ्यांची अंमलबजावणी गुरुवार, २५ ऑगस्टपासून होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेवर १९ ऑगस्टपासून दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची भर पडली. त्यामुळे दररोज होणाऱ्या ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ झाली. मात्र सामान्य लोकल फेऱ्या रद्द करुन दहा फेऱ्या चालवण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. यापूर्वीही बहुतांश सामान्य फेऱ्या रद्द करुनच वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालविल्या जात आहेत. परिणामी सामान्य प्रवाशांची गर्दीच्या वेळी गैरसोय होत होती. कळवा, बदलापूर स्थानक येथे प्रवाशांनी आंदोलनही केले. लोकप्रतिनिधींनीही मध्य रेल्वेच्या भूमिकेला विरोध केला. राष्ट्रवादी काॅंग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला, तर बुधवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मध्य रेल्वेने १९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करुन त्याबदल्यात पुन्हा सामान्य लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. या वातानुकूलित लोकल फेऱ्या तात्पुरत्या रद्द केल्या असून २५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. त्यामुळे आता वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरुन ५६ झाली आहे. सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा दरम्यान वातानुकुलीत लोकलच्या फेऱ्या होतात.

पुढील दहा फेऱ्या सामान्यऐवजी वातानुकूलित फेऱ्या म्हणून चालवण्यात आल्या होत्या. आता २५ ऑगस्टपासून या फेऱ्या पुन्हा सामान्य लोकल म्हणून प्रवाशांच्या सेवेत असतील.

दहा फेऱ्यांच्या वेळा डाऊन मार्ग

सीएसएमटी-बदलापूर- स.९.०९ वा

सीएसएमटी-कल्याण-दु.१२.२५ वा

सीएसएमटी-ठाणे-दु. ३.०२ वा

सीएसएमटी-बदलापूर-सायं.५.२२ वा

सीएसएमटी-ठाणे-रा.८.३० वा

अप मार्ग

ठाणे-सीएसएमटी-स.८.२० वा

बदलापूर-सीएसएमटी-स.१०.४२ वा

कल्याण-सीएसएमटी-दु.१.३६ वा

ठाणे-सीएसएमटी-सायं.४.१२ वा

बदलापूर-सीएसएमटी-सायं.६.५५ वा