भूसंपादनाची भरपाई देण्यासाठी सहा लाखांची मागणी मुंबई: सरकारने संपादित केलेल्या जमिनीची नुकसानभरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी सहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली भिवंडीतील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अटक केली. त्यात विजय भोईर ऊर्फ पिंटय़ा आणि लक्ष्मण शेठ राजपुरोहित या दोन खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. तक्रारदार यांच्या मालकीची कल्याण-कसारा परिसरात शेतजमीन होती. रेल्वेमार्गासाठी सरकारने ही जमीन संपादित केली होती. त्या मोबदल्यात त्यांना सरकारकडून ५५ लाख रुपयांचे नुकसानभरपाई मिळणार होती. नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांनी भिवंडीतील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र या अर्जावर सुनावणी होत नव्हती. त्यामुळे त्यांनी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांची भेट घेऊन त्यांच्या अर्जाविषयी विचारणा करून त्यांची नुकसानभरपाई मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यासाठी नऊ लाख रुपयांची लाचेची मागणी झाली,असा आरोप आहे. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे विठ्ठल गोसावी यांच्याविरुद्ध लेखी तक्रार केली. या तक्रारीची १६ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारीला शहानिशा करण्यात आली होती. त्यात विठ्ठल गोसावी यांनी नऊ ऐवजी सहा लाख रुपयांची लाच घेण्याचे मान्य करुन लाचेची रक्कम मध्यस्थी खासगी व्यक्ती विजय भाईर आणि लक्ष्मण शेठ यांना देण्यास सांगितले होते. गुरुवारी या अधिकार्यानी सापळा रचून लक्ष्मणशेठ याला लाचेची दोन लाख रुपयांची रोख आणि चार लाख रुपयांचा धनादेश असा सहा लाख रुपयांसह रंगेहाथ पकडले. यापूर्वी लक्ष्मणशेठने दूरध्वनीवरून विठ्ठल गोसावी आणि विजय भाईर यांच्याशी संपर्क साधून लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे या दोघांनाही नंतर लाचेच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ कोटी ३४ लाख ७३ हजार रुपयांचे ४३ वेगवेगळय़ा बँकांचे धनादेश जप्त केले आहे. या धनादेशावर नाव नव्हते, मात्र सही केल्याचे दिसून आले आहे. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.