मुंबई : राज्यामध्ये शनिवारी 'एच ३ एन २'बाधित तिघांचा संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वाशीम, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे मनपा येथे या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे संशयित मृत्यूंची संख्या चार झाली आहे. तसेच शनिवारी राज्यामध्ये १८ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस 'एच ३ एन २' आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी राज्यात १८ नव्या 'एच ३ एन २' रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या १८४ वर पोहोचली. तसेच शनिवारी ३ संशयित मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी १ मृत्यू वाशीम, १ मृत्यू खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि १ मृत्यू पुणे मनपा येथील आहे. मृत्यू परिक्षणानंतर या सर्वांच्या मृत्यूच्या कारणाची निश्चिती करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्या राज्यात संशयित मृत्यूची संख्या चार झाली आहे. तसेच राज्यामध्ये 'एच ३ एन २'ने एका रुग्णाचा, तर 'एच १ एन १'ने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फल्युएंझाचे ३ लाख ०४ हजार ६८६ संशयित रुग्ण सापडले असून त्यांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यातील 'एच १ एन१' चे ४०५ तर 'एच ३ एन २'चे १८४ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १९६ रुग्णांवर सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.