खोळंबणारी विमाने, रखडणाऱ्या रेल्वे यामुळे पावसाळ्यातील परदेशी पर्यटकांची संख्या घटली
खोळंबणारी विमान उड्डाणे, रखडणारी रेल्वे, रस्त्यावरील खड्डे आणि कोसळणाऱ्या दरडी यामुळे ठप्प होणारी वाहतूक आदी विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांंत राज्यात पावसाळ्यात भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने कमी-कमी होत चालली आहे.

पावसाच्या धारा आणि त्यात चिंब न्हाऊन निघालेला हिरवागार निसर्ग जोडीला पुरातन वास्तूचा परिसस्पर्श असेल तर सोन्याहून पिवळे या भावनेने महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असे. परदेशी पर्यटक हे बऱ्याचदा थंडीच्या मोसमात जेव्हा आपल्याकडच्या मोठय़ा सणांना नुकतीच सुरूवात होत असते त्यावेळी इथे येणे पसंत करतात. पण महाराष्ट्रातील हिरवेगार निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळ्याशिवाय चांगला पर्याय नाही. त्यातही या पर्यटकांचा कल हा पुरातन वास्तूंना भेट देण्याकडे असतो आणि महाराष्ट्रात ‘युनेस्को’ने प्रमाणित केलेल्या जागतिक पुरातन वास्तूंपैकी पाच ठिकाणे आहेत. यात औरंगाबादजवळील अजंठा-वेरूळ लेणी, कास पठार, मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा, एलिफंटा-घारापुरी लेणी आणि बुलढाण्यातील लोणार या ठिकाणांना परदेशी पर्यटक भेट देतात. शिवाय, पावसाळ्यात भंदारदरा, माळशेज घाट, चिखलदरा इथेही त्यांची संख्या जास्त असते. परंतु, गेली अनेक वर्षे ही संख्या सातत्याने कमी होते आहे, अशी माहिती पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सध्या पावसाळ्यात या ठिकाणांना भेटी देणाऱ्या स्थानिक पर्यटकांचा आकडा वाढत चालला असला तरी परदेशी पर्यटकांची संख्या मात्र घटली असल्याचे ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’च्या (एमटीडीसी) आकडेवारीवरुन निष्पन्न झाले आहे. २०१० मध्ये महाराष्ट्रात पावसाळ्याच्या मोसमात भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या १,४३४ एवढी होती. हा आकडा वाढण्याऐवजी सतत कमी होत गेला असून गेल्यावर्षी हा आकडा ८७९ एवढाच होता. पावसाळ्यात फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील परदेशी पर्यटकांची संख्या घटली असल्याची माहिती नायर यांनी दिली. अगदी मुंबईच्या चमचमत्या मायानगरीतही यावेळी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी भंडारदरा, लोणावळा, अजंठा, चिखलदरा, माथेरान येथे भेट देणाऱ्या, राहणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या अडीच लाखांच्या घरात पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात खराब हवामानामुळे सतत उशिरा येणाऱ्या फ्लाईट्स, रेल्वेने प्रवास करतानाही कित्येकदा रेल्वे बंद पडल्याने रद्द करावे लागणारे दौरे, रस्त्यात दरड कोसळण्याच्या घटना अशा अनेक कारणांमुळे परदेशी पर्यटकांना त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्याची पाळी येते. त्यामुळे या मोसमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे.

 – वल्सा नायर सिंगमुख्य सचिव, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग

मुंबई हे एका अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी जाता-येता भेट देण्याचे ठिकाण आहे. ते फार काळ इथे वास्तव्य करत नाहीत. आपल्याकडचा पावसाळा हा त्यांच्यासाठी पर्यटनाचा मोसमच नाही. त्यामुळे फार कमी संख्येने ते इथे येतात. मात्र मध्य पूर्वेकडील देशांचे लोक जे पावसाळ्यात केवळ खरेदी करण्यासाठी आणि राहण्यासाठी इथे यायचे त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे.

 – दीपक देवा, व्यवस्थापकीय संचालक, ट्रॅव्हल कॉर्पोरेशन, इंडिया